यवतेश्वर घाटात कोसळली दरड   

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत. सातार्‍याकडून कास पठाराकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे. रात्री उशिरा ही दरड कोसळल्याने अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकले नाही.
 
सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. कास, बामणोली तसेच अनेक गावांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. त्यामुळे आता घाट रस्त्यातून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे. 
 
पुणे-बंगळूर महामार्गावर शेंद्रेपासून कोल्हापूरकडे जाणार्‍या रस्त्यावर शुक्रवारी वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेल्याचे पहायला मिळाले.

Related Articles